जुना राजवाडा
जुना राजवाडा म्हणजे करवीर संस्थानच्या राजधानीची डौलदार वास्तू, हि वास्तू दुमजली,काही भागांत तीन मजली व वाड्याच्या आतल्या भागात सहा सुंदर दगडी चौक व कारंजा असणारी. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या सूनबाई ताराराणी यांनी करवीर संस्थानची स्थापना केली. संस्थानची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात आणली.शिवरायांशी इतके थेट नाते असणारा हा राजवाडा म्हणजे तत्कालीन मराठा बांधकाम शैलीचा एक नमुना आहे.राजवाड्यात आज पोलिस ठाणे, प्रांत ऑफिस, रजिस्टर ऑफिस अशी कार्यालये आहेत,पण त्या काळातली खजिना, टांकसाळ ( नाणे पाडण्याचा कारखाना ), दरबार अशी वेगवेगळी दालने आजही बंद आहेत.
जुन्या राजवाड्याचा नगारखाना ही स्वतंत्र वास्तू आहे. राजवाड्यानंतर हा नगारखाना बांधला आहे. पण दगडी चार मजली हा नगारखाना म्हणजेच जुना राजवाडा आहे,अशी बहुतेकांची समजूत आहे. या नगारखान्यात गुळगुळीत संगमरवरी दगडाचा आयने महाल आहे. या दगडात आपले प्रतिबिंब दिसू शकते इतकी त्याची नजाकत आहे.जुन्या राजवाड्याच्या आवारात 1857 च्या उठावात चिमासाहेब महाराजांनीच उठावाला बळ दिले या संशयावरून चिमासाहेब महाराजांना ब्रिटिशांनी कोल्हापुरातून कराचीला नेऊन नजरकैदेत ठेवले.या राजवाड्यात झालेला उठाव ब्रिटिशांनी मोडून काढला.क्रांतिकारकांना राजवाड्याच्या परिसरात मृत्युदंडास सामोरे जावे लागले.स्वातंत्र्य लढ्यातील उठावाचा जुना राजवाडा हा एकमेव साक्षीदार आहे.दरवर्षी जुन्या राजवाड्यामध्ये गणेशोत्सवाला इथे गणेश मूर्ती बसवली जाते.