आठवणीतील छ.शाहू मिल - SHREE SHAHU CHHATRAPATI MILLS KOLHAPUR
2022 हे कोल्हापूर साठी खूप महत्त्वाचा वर्ष आहे दि. १८ एप्रिल ते दि. २२ मे २०२२ या काळात कोल्हापूरात ‘श्री राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व’ संपन्न होत आहे.यानिमित्ताने आज शाहू मिल येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
लहानपणापासून या मिलबाबत खूप गोष्टी ऐकल्या होत्या आज स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने प्रथमच श्री शाहू मिल ही वास्तु पाहण्यात आली.साधारण 26 एकर परिसरामध्ये भव्य अशा इमारती आजही आपल्याला पहायला मिळतात.या वास्तू पाहिल्यानंतर श्री शाहू महाराजांचे कामाबद्दलचे व्यवस्थापन कसे होते याची जाणीव होते.या वास्तूबद्दल लिहायचं म्हटलं तर खूप सार्या लेखमाला होतील त्याचे बारकावे आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.या मिल उभारणी करताना जवळच असलेले कोटीतीर्थ मधील पाण्याचा उपयोग करण्यात आला आहे.मिलमधील दररोजच्या पाण्याचा वापर याच कुंड्यांमधून होत असावा,तसेच मिलमध्ये साधारण सहा ते सात बोअर मारलेले आपल्याला आजही दिसून येतात. काही बोर मधील पाणी सध्या वापरण्यात येते.
मिलमधील प्रत्येक ऑफिस व इतर इमारती याच्या स्लँब वर पाण्याचे उत्तम व्यवस्थापन आजही आपल्याला पाहायला मिळेल.पावसामध्ये स्लॅब वर पडणारे पाणी वाहून खराब न होता ते पाणी इतर इतर कामासाठी वापरता यावे यासाठी स्वतंत्र नळ हे बसवण्यात आले होते.सर्व इमारती वरचे पाणी एका मोठ्या प्रमाणामध्ये स्टोअर केले जायचे व त्याच्यावर योग्य ती प्रक्रिया करून ते पाण्याचा वापर केला जायचा.
मिल मध्ये फिरत असताना दोन गोष्टीं आज खुप आवडल्या ते म्हणजे इमारतीमधील बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटा व दरवाजाचे लोखंडी कुलूप.
पहिल्यांदा आपण बांधकामासाठी वापरलेल्या विटांची माहिती घेऊया.मिल मध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणात इमारती दिसल्या साधारण सर्व इमारतींचे दगडी बांधकाम आहे.फिरत असतानाच एक गोष्ट निदर्शनास आली बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटा.ज्या ठिकाणी धूर जाण्यासाठी धुरांडी आहे तेथील वास्तुची पडझड झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विटा पडलेल्या दिसल्या त्या विटा मध्ये काही विटा या मातीच्या आहे तर काही चिनीमाती किंवा शिसे व गुळ किंवा इतर मातीचा उपयोग करून या विटा बनवल्या असाव्या असे वाटते.या विटा बाबतीत कुणाला माहिती असेल तर नक्कीच मार्गदर्शन करावे.तसेच या विटांचा वापर फक्त बांधकामातील कमानी साठी केला आहे.या वास्तूच्या शेजारी दगडी पायर्या दिसून आल्या.पायर्या मधून खाली गेल्यानंतर अंधार असल्यामुळे काही दिसत नाही.खालच्या वास्तूमध्ये पाण्याच्या टाक्या दिसून येतात.कोटीतीर्था मधून येणारे पाणी हे येथूनच येत असावे असे वाटते.कोटीतिर्थापासुन स्वतंत्रपणे मिलमध्ये पाण्यासाठी मार्ग केला आहे तोच मार्ग येथे जोडला गेला आहे.तसेच सदरची वास्तू ही जमिनीपासून साधारण दहा फूट अंतर खाली असल्यामुळे पावसाळ्यामध्ये जमिनीचे पाणी खालच्या वास्तूमध्ये येत असल्यामुळे हे पावसाचे पाणी या पाण्या मध्ये मिक्स होऊ नये म्हणून वेगळ्या पद्धतीने स्टोअर केले जायचे.पाण्यासाठीचा हे नियोजन खुपच सुंदर आहे.
या वास्तूपासून बाहेर आल्यावर आपल्याला श्री हनुमानाचे मंदिर पाहायला मिळेल.लाकडामध्ये तिन कमानी दिसून येतात. दोन लहान व एक मोठी अशी सुंदर कमान आहे तसेच या कमानीवर सुदंर कोरीव काम केले आहे. याच कमानीच्या खालच्या बाजूला या मंदिराचे बांधकाम बद्दलचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल.तत्कालीन इंजिनियर मेजर सखाराम महादेव घाटगे यांनी स्वखर्चाने 15 एप्रिल 1965 साधी हे मंदिर बांधले. हनुमान जयंती वेळी मोठ्या प्रमाणामध्ये मिल मधील सर्व कर्मचारी येत असत. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर आपल्याला पाण्याचा बोर दिसेल.आजही या बोर मध्ये आपल्याला पाणी आढळून येते.
येथून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूस आपल्याला शिशुगृह पहायला मिळेल.मिल मधील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी त्याची बांधणी करण्यात आली आहे,शेजारी मुलांना खेळण्यासाठी गार्डनची सोय करण्यात आली आहे.
मिलच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस सर्व ऑफिसेस आपल्याला पाहायला मिळतात.ऑफिसेस मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया याचेही ऑफिस होते असे दिसून येते.त्या इमारतीच्या वरच्या बाजूस आपल्याला वॉटर कंजर्वेशन सिस्टीम पाहायला मिळेल.काही ऑफिस मध्ये कुलूप लावलेले पहायला मिळेल. कुलूप पाहत असताना एक गोष्ट निदर्शनास आली की या कुलूूूपावर इंग्रजी अक्षरांमध्ये “SHREE SHAHU CHHATRAPATI MILLS KOLHAPUR” लिहल आहे.सदरचे हे कुलूप 6 LEVERS आहे. तसेच काही लहान कुलूूूपांवर S.S.C.Mills Kolhapur असे आहे. यावरून असे लक्षात येते की त्यावेळी येथील काही गोष्टी स्वबनावटीच्या होत्या. सदरच्या सर्व वास्तू पाहिल्यानंतर असे निदर्शनास येते की आपण शाहू महाराजांना दूरदृष्टीची राजे का म्हणत होतो नक्कीच कळून येते.
नवरात्रामध्ये पंचमीच्या दिवशी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ची पालखी येथे येते.ज्यावेळी मिल सुरू होती त्यावेळी देवीची पालखी कोटीतीर्थ नंतर येथे येत असत.यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये मिल मधील सर्व कर्मचारी जगदंबेच्या पालखीच्या दर्शनासाठी येत असत.काही वर्षानंतर मिल बंद झाल्यानंतर वर्षातून एकदा पालखीसाठी ही मिल ओपन केली जाते. काही वेळ इथे ही पालखी थांबून त्र्यंबोली कडे जाते.हे वर्ष राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी चे वर्ष आहे.या निमित्ताने दि. १८ एप्रिल ते दि. २२ मे २०२२ या काळात कोल्हापूरात ‘राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व’ संपन्न होत आहे.
या दरम्यान ऐतिहासिक शाहू मिलमध्ये छायाचित्र प्रदर्शन, कृषी प्रदर्शन आणि सांस्कृतिक सह अनेक उपक्रम संपन्न होणार आहेत. या जागेवर लवकरात लवकर भव्य असे श्री राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक व्हावे हीच जगदंबे चरणी प्रार्थना….
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places



