कै. नानासाहेब यादव यांच्या सारख्या जुन्या लोकांनी सांगितलेल्या आठवणी नुसार हा रथोत्सव म्हणजे फक्त एक धार्मिक सोहळा नव्हता तर करवीर संस्थानचे एक लष्करी संचलनच असायचे. सर्व शाही लवाजम्यासह होणारा हा रथोत्सव करवीरनिवासिनी च्या रथाच्या मार्गानेच ( भवानी मंडप- मलग हायस्कूल-मिरजकर तिकटी- बिनखांबी गणेश मंदिर- महाद्वार रस्ता- महाद्वार चौकात करवीर निवासिनी कडून आरती स्विकारून पुढे- गुजरी – भावसिंगजी रस्ता- नगारखाना मार्गे पुन्हा भवानी मंडप )प्रवास करतो.
रथोत्सवा दिवशी रात्री आठ वाजता छत्रपतींच्या अंबा देवघरात हुजुर स्वारीच्या म्हणजे महाराज छत्रपतींच्या हस्ते आरती संपन्न होते त्या नंतर चोपदारांच्या ललकारी पाठोपाठ शिवरायांची मूर्ती रथारूढ केली जाते. पुन्हा एकदा महाराज रथाची पूजा करतात आणि रथ भाविकांकरवी ओढून मार्गस्थ केला जातो.